पराड नदी किनाऱ्याचा भाग खचला ; नजीकच्या घरांना धोका

ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्याकडून पाहणी ; प्रशासनाचे लक्ष वेधले

मालवण : सतत चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालवण तालुक्यातील पराड गावातील नदीकिनारी असलेला भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे नदीकिनारीपासून सुमारे ५० फूट अंतरावर नजीकच्या वस्ती असलेल्या घरांना याचा धोका निर्माण झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

नदीकिनारी भाग अचानक खचल्याने त्याठिकाणी स्थानिक ग्रामस्थाची होडी बुडण्याच्या मार्गावर होती. ती होडी इतर ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढली. सदर घटनास्थळी शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख खोबरेकर यांनी भेट देत पाहणी केली व शिवसेना आमदार वैभव नाईक तसेच मालवण तहसीलदार यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली व याबाबत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी सध्याच्या बजेटमध्ये धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर करून आपणास कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून बांधून देण्यात येईल परंतु तोपर्यंत तात्पुरती नेमकी कोणती उपाय योजना करता येईल याबाबत संबंधित खात्याशी लवकरच चर्चा करून आपण प्रत्यक्ष भेट घेऊन ठरवू अशी ग्वाही उपस्थित ग्रामस्थांना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या मार्फत दिली. तसेच मालवण तहसीलदार यांनी पेंडूर तलाठी यांना घटनास्थळाची पाहणी करून योग्य तो पंचनामा करून अहवाल पाठवण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह शिवसेना ठाकरे गट विभाग प्रमुख कमलाकर गावडे, शाखाप्रमुख संतोष नागवेकर, शाखाप्रमुख निलेश हडकर, ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, अक्षय भोसले, विजय पालव, प्रदीप आवळेगावकर, आनंद आवळेगावकर, प्रभाकर नागवेकर, प्रकाश सहदेव नागवेकर, रामचंद्र नागवेकर, अंकुश आवळेगावकर, सर्वेश नागवेकर, दीपश्री आवळेगावकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3593

Leave a Reply

error: Content is protected !!