आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला

महाराष्ट्राच्या पॉलिटिकल ड्राम्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

कुणाल मांजरेकर

महाराष्ट्राच्या राजकारणात आज नाट्यमय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फुट पडली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी भाजपा – शिंदे सरकारला पाठींबा दिला असून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. या घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला… उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं. त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे
.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!