सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोकण रेल्वेने खत जिल्ह्यात दाखल ; मनिष दळवींच्या प्रयत्नांना यश !

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला होता पाठपुरावा ; वेळेत खत उपलब्ध झाल्याने शेतकरी, ख.वि संघांनी मानले आभार

कुडाळ : पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना आवश्यक असलेले खत वेळेत मिळत नाही म्हणून यावर्षी कोकण रेल्वेद्वारे झाराप रेक पॉईंट वर खत ऊतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी साठी सुफला व युरिया अशी २३०० मॅट्रिक टनाची मागणी करण्यात आली. पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी केलेला पाठपुरवठा व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. सोमवारी सकाळी १०.१५ वा. झाराप स्टेशन रेक पॉइन्टला रेल्वे मालगाडीच्या २३ डब्यातून सुमारे १५१२ मेट्रीक टन खत दाखल झाले. मनिष दळवी यांच्या हस्ते रेल्वे मालगाडी डब्याचे पुजन करून श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कृषी अधिकारी विजयकुमार राउत, नगरसेवक विलास कुडाळकर, निलेश तेंडूलकर, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, झाराप रेल्वेस्टेशन मलवाहतुक अधिकारी संजय पुरलकर, जिल्ह्यातील तालुका ख.वि.संघाचे चेअरमन, व्यवस्थापक, पदाधिकारी, जिल्हा बँक अधिकारी, शेतकरी,वाहतुक संघटना पदाधिकारी शिवाजी घोगळे, शरद वालावलकर, मनोज वालावलकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रालय मुंबई येथे खरीप हंगाम आढावा बैठक घेऊन विशेष लक्ष दिल्यामुळे पावसाळ्या पूर्वी आवश्यक असलेले खत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होईल अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष दळवी यांनी जिल्हावासियांना दिली होती. यासाठी मुंबई मंत्रालयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठक घेतली होती. खरीप हंगाम आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरवर्षी या जिल्ह्यात खतपुरवठा उशिराने होतो व बोगस खतांचा या जिल्ह्यात एजंटामार्फत पुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते याबाबत बैठकीत मनिष दळवी यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.या बैठकिस कृषी विभागाचे अधिकारी व कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे व मनिष दळवी यांनी केलेल्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील शेतकरी हिताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी खरीप हंगामासाठी ११००० पेक्षा जास्त मॅट्रिक टन खताची आवश्यकता असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी यातील काही खत मे महिन्यात उपलब्ध होणे आवश्यक असते. म्हणून १८०० मॅट्रिक टन सुपला व पाचशे मेट्रिक टन युरिया खताची मागणी या वेळी नोंदवली होती. आरसीएफ या खत कंपनीने हे खत उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. हे खत थेट रेल्वेने झाराप रेक पॉइंट वर उतरले जाईल. मोठ्या गोदामाची उपलब्धता नसल्यामुळे हे तालुका खरेदी विक्री संघाच्या गोदामा मध्ये रेक पॉइंटवरून नेण्यात येईल व थेट शेतकऱ्यांना खरेदी विक्री संघामध्ये उपलब्ध होईल. पावसाळ्या पूर्वी झाराप येथे हे खत उतरवण्यात आले असुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाला संपर्क साधून आपल्या मागणी नुसार हे खत उपलब्ध करून घ्यावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पाच कोटी पेक्षा जास्त अर्थसाहायाची आवश्यकता असते. म्हणूनच जिल्हा बँकेने हे पाच कोटी कर्जाची उचल जिल्ह्यातील सहकारी सोसायटी यांना दिली आहे. सहा महिन्याच्या मुदती करता हे कर्ज असून या शेतकऱ्यांच्या कर्जावर पाच टक्के कमी व्याजदर आहे. खत कंपन्या रोखीने खत वितरण करण्याचे धोरण असल्यामुळे शेतकऱ्यांना हे विना सहज कर्ज तातडीने उपलब्ध व्हावे या दृष्टीने सोसायटीला कॅश क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. झाराप रेल्वे स्टेशनच्या रेक पॉईंट नजीक नऊ कोटी रुपये खर्च करून शासनाच्या वतीने ३००० मेट्रिक टन क्षमतेचे एक गोदाम बांधण्यास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिली आहे. लगतच्या काळात गोदामाचे प्रश्न मार्गी लागेल. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!