राज्यातील दंगलींमध्ये उद्धव ठाकरे मास्टरमाईंड ? ठाकरेंची नार्कोटेस्ट करा…

आ. नितेश राणे यांची मागणी ; संजय राऊत यांच्याकडून अनेक दिवस राज्यात दंगली घडण्याची भाकीते कशी ?

काँग्रेसच्या एका नेत्याकडूनही कोल्हापूर येथे दंगली घडण्याची शक्यता केली होती व्यक्त

कणकवली : राज्यात काही जणांकडून औरंगजेब, टिपू सुलतान यांच्यावर अचानक प्रेम उफाळून आलेले नाही. याचे काही दिवसापूर्वी पासून प्लॅनिंग सुरू आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या एका नेत्याने कोल्हापूर येथे दंगली घडतील अशी शक्यता वर्तवली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राजाराम राऊत तर गेले कित्येक दिवस राज्यात दंगली घडणार म्हणून किंचाळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यभिषेक दिनी औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे स्टेटस ठेवले गेले. सत्ता आली पाहिजे तर दंगली घडल्या पाहिजेत ही भूमिका उद्धव ठाकरेंची २००४ पासून आहे. आज सुद्धा त्यांना सत्ता हवी आहे. मग या दंगलीमागे उद्धव ठाकरे मास्टर माईंड आहे का ? याची चौकशी करा. उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

कणकवली येथे पत्रकारांशी बोलतांना आमदार नितेश राणे यांनी दंगली घडण्यासाठी महाविकास आघाडीतील काही लोकांचा हात असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी अमेरिकेत भारतीय आणि हिंदू विरोधी भूमिका मांडत आहेत. तेव्हाच कोल्हापूर मधील त्यांचे नेते दंगली घडणार म्हणून सांगत आहेत. आणि त्याच दोन आठवड्यात औरंग्या आणि टिपू सुलतानचे स्टेट्स काही युवक लावतात. याचा थेट संबंध कोणाशी कसा येतो हे चौकशीत नक्कीच स्पष्ट होणार आहे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तसे विधान केलेले आहे याची आठवण यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.

महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा याकूब मेमनची कबर सुशोभित केली, विद्युत रोषणाई केली. औरंगजेबची कबर सजविली. हे प्रेम महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उत्पन्न झाले होते. त्यामुळे दंगली घडविण्याचे इंटेन्शन महाविकास आघाडीचे आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाच्या वतीने चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार आहे. काही दिवसा पासून राज्यातील काही जिल्ह्यात जिहादी कार्टे वातावरण बिघडवत आहेत. औरंगजेब आणि टिपू सुलतानचे प्रेम ज्यांना असेल त्यांना त्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था आम्ही करू. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आम्ही कधीही खपवून घेणार नाही आणि औरंगजेब टिपू सुलतान यांचा उदो उदो केला जात असेल, स्टेटस ठेवले जात असतील, फलक नाचवले जात असतील तर तेही सहन करणार नाही. अशा महाराष्ट्र द्रोहींवर कारवाई होणार इशारा यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
महाविकास आघाडीला मोगली राज्य हवे असेल आणि महाराष्ट्रात मोगली राज्य पुन्हा आणायच आहे म्हणून दंगली घडवत असतील तर आम्ही छत्रपती शिवरायांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी सज्ज आहोत. महाराजांच्या अस्मितेसाठी आणि हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी प्रसंगी तलवार पण हातात घेण्यास तयार आहोत, असा इशारा यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!