शिरवंडेत ठाकरे शिवसेनेला उमेदवार सापडेना ; अख्खी ग्रामपंचायत भाजपकडे बिनविरोध !

भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील घाडीगावकर यांची रणनीती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील शिरवंडे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या विरोधात उमेदवार न मिळाल्याची नामुष्की ठाकरे शिवसेनेवर ओढवली आहे. भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे आणि प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती सुनील घाडीगावकर यांच्या रणनीतीमुळे शिरवंडेत सरपंच पदासह ग्रामपंचायतीच्या नऊही जागा भाजपाकडे बिनाविरोध आल्या आहेत. या सर्व उमेदवारांचे भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. निलेश राणे यांचे नेतृत्व आणि दत्ता सामंत यांचे भक्कम पाठबळ यांमुळे शिरवंडे मध्ये भाजपवर ग्रामस्थानी विश्वास दाखवला असून आगामी काळात गावच्या विकासात कोणतेही राजकारण न आणता ग्रामस्थांना अपेक्षित विकास घडवून आणला जाईल, अशी ग्वाही सुनील घाडीगावकर यांनी दिली आहे.

शिरवंडे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे संपूर्ण पॅनल बिनविरोध झाले आहे. यामध्ये सरपंचपदी चैताली चंद्रकांत गावकर तर प्रभाग १ मधून सदस्य पदी सुप्रिया प्रकाश बाणे, नयना वामन शिरवंडेकर, विजय काशीराम खांडेकर, हरेश्वर दत्ताराम गावकर, प्रभाग २ मधून कैलास श्रीधर गावकर, तनुजा हनुमंत गावकर, अस्मिता अमोल गावकर, प्रभाग ३ मधून सुरेश श्रीधर गावकर, प्राची महेश घाडीगावकर, रघुनाथ अरुण गावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

गावचा राजकारण विरहित विकास करणार : सुनील घाडीगावकर

शिरवंडे गावच्या ग्रामस्थानी भाजपच्या पक्ष नेतृत्वावर विश्वास दाखवत ही ग्रामपंचायत बिनविरोध आमच्याकडे दिली आहे. भाजप नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत भाजपने कोणत्याही पक्षाशी तडजोड न करता ही ग्रामपंचायत पूर्ण ताकदीने ताब्यात घेतली असून या निवडणुकीत आम्हाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही ऋणी आहोत. आगामी काळात पक्षीय मतभेद विसरून भाजपाच्या माध्यमातून गावचा विकास केला जाईल, अशी ग्वाही माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी देतानाच आगामी काळातील प्रत्येक निवडणुकीत ग्रामस्थांनी भाजपच्या बाजूने उभे रहावे असे ते म्हणाले. भाजप नेते दत्ता सामंत व्यवसायानिमित्त गेली १० वर्षे शिरवंडे गावात कार्यरत असून या काळात त्यांनी वैयक्तिक निधीतून देखील गावचा विकास केला आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळेच आज भाजपला प्रत्येक निवडणुकीत यश मिळत आहे, असेही ते म्हणाले.

बिनविरोध झालेल्या सर्व उमेदवारांचे भाजप नेते दत्ता सामंत यांनी अभिनंदन केले. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुशांत घाडीगावकर, प्रशांत परब, बाळा राऊत, नंदू आंगणे, सरपंच संतोष लाड, सोनू गावकर, रवींद्र बाबली गावकर, विश्वास बाणे , लक्ष्मण गावकर, रवींद्र शंकर गावकर, अतुल गावकर, प्रमोद घाडी, हनुमंत गावकर, दिलीप लाड यांच्यासह भाजपचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!