आ. निलेश राणेंच्या पाठपुराव्याला मोठे यश ; सोनवडे घाटाला केंद्राचा ‘ग्रीन सिग्नल’!

आ. राणे यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आरोग्यमंत्री आबिटकरांसह अधिकाऱ्यांचे मानले आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्गवासीयांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बहुप्रतीक्षित सोनवडे घाट रस्ता प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाली असून, प्रकल्पाच्या पुढील कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी यापूर्वीच मिळाली होती. आता केंद्राची अंतिम परवानगी मिळाल्याने सोनवडे घाट प्रकल्पाला अधिकृतपणे ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याची घोषणा कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केली आहे.

हा घाट रस्ता मंजूर होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आरोग्यमंत्री आबिटकरांसह अधिकाऱ्यांचे आ. राणे यांनी आभार मानले आहेत.अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. केंद्र सरकारकडून आवश्यक असलेली अंतिम मंजुरी मिळणे ही या प्रकल्पातील महत्त्वाची अडचण दूर करणारी बाब मानली जात आहे. त्यामुळे आता स्थानिक आणि राज्यस्तरावरील उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला गती देण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

“हा केवळ रस्ता नसून अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवणारा ऐतिहासिक प्रकल्प आहे,” अशी भावना व्यक्त करत आमदार निलेश राणे यांनी या मंजुरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. खासदार राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सोनवडे घाट प्रकल्पाला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच केंद्र आणि राज्यातील संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळण्याचा मार्ग सुकर झाला, असे निलेश राणे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या अधिकारी वर्गाचेही विशेष कौतुक केले. “दिवसरात्र पाठपुरावा करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचे मी मनापासून आभार मानतो. हा प्रकल्प किती मोठा आहे आणि तो कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे, याची अनेकांना कल्पनाही नसेल. आज तो मार्गावर येत असल्याचा आनंद आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सोनवडे घाट प्रकल्पामुळे परिसरातील दळणवळण, वाहतूक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे केंद्राची अंतिम मंजुरी मिळाल्याने सोनवडे घाटाच्या प्रत्यक्ष पूर्णत्वाकडे आता निर्णायक पाऊल पडले असून, पुढील काम कधी सुरू होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!