मालवणात गटार खोदाई आणि कचऱ्याच्या समस्येवरून शिवसेना पदाधिकारी आक्रमक

आ. वैभव नाईकांसमोर पालिका प्रशासनाला विचारला जाब : आमदारांकडूनही नाराजी व्यक्त

कुणाल मांजरेकर : मालवण

मालवण शहरात अपूर्ण गटार खोदाई आणि कचऱ्याची समस्या ज्वलंत बनली आहे. यावरून मंगळवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ठेकेदार जिल्ह्या बाहेरील असल्याने त्याला गटार खोदाईला माणसे मिळत नाहीत, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगताच कामगार मिळत नाहीत, तर मी लमाणी कामगार शोधून आणू का ? असा संतप्त सवाल आ. नाईकांनी उपस्थित करीत कामगार उपलब्ध करण्याची ठेकेदाराची जबाबदारी आहे. त्यामुळे कारण सांगत बसू नका, कामे वेळेत पूर्ण करून घ्या, असे सक्त आदेश आ. वैभव नाईक यांनी दिले.

आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी मालवण पालिका कामांचा आढावा मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्याकडून घेतला. यावेळी पालिका अधिकारी यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत, उपशहरप्रमुख किसन मांजरेकर, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, यशवंत गावकर, संमेश परब, पंकज सादये, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, अमेय देसाई, सिद्धार्थ जाधव, नरेश हुले, प्रसाद आडवणकर, मनोज मोंडकर तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पावसाळा आला तरी गटार खोदाई पूर्ण न झाल्याने तसेच ज्या ठिकाणी गटार खोदाई झाली ते कामही योग्य न झालेबाबत शिवसेना पदाधिकारी यांनी यावेळी समस्यांचा पाढा वाचला. यावेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले, टेंडर दोन वेळा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. आता सिंधुदुर्ग बाहेरील ज्या ठेकेदार एजन्सीने टेंडर घेतले आहे, त्याला गटार खोदाईस कामगार मिळत नाहीत. यावर कामगार नाहीत, हा ठेकेदाराचा प्रश्न आहे. काम वेळेत व योग्य पद्धतीने झाले पाहिजे. अशी भूमिका नरेश हुले आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मांडली. उद्या कामगार कमी म्हणून ठेकेदार बील कमी घेणार का ? असा संतप्त सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला.

… त्यावेळी नगरसेवक यतीन खोत नाहक बदनाम

गतवर्षी गटार खोदाई वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी तत्कालीन नगरसेवक यतीन खोत यांनी माणूसकीच्या भावनेने सहकार्य केले. कोरोना काळ असताना ठेकेदारास कामगार उपलब्ध केले. मात्र त्यावेळी गटारांची कामे घेतली, म्हणून यतीन खोत यांची नाहक बदनामी झाली. वास्तविक त्यांनी प्रशासनाला सहकार्य केले होते. मात्र अशी बदनामी होणार असेल तर यापूढे कोण सहकार्य करण्यास पुढे येणार नाही, याचा विचार झाला पाहिजे.आता ठेकेदारास कामगार मिळत नाहीत तर मी लमाणी कामगार उपलब्ध करून देऊ का ? असा सवाल उपस्थित करत पालिका प्रशासनाने लवकरात लवकर गटार खोदाई पूर्ण करून घ्यावी अश्या सूचना वैभव नाईक यांनी केल्या.

ठेकेदाराला स्वतःला काही माहीत नाही, तरी तो स्थानिकांना विश्वासात घेत नसल्याचे किरण वाळके यांनी सांगितले. तर महेश जावकर आणि अन्य पदाधिकारी यांनी मेढा सह अन्य भागात अजून गटार खोदाई सुरू झाली नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. रेवतळे सागरी महामार्ग सध्या कचऱ्याचे डस्टबीन बनल्याचे उपस्थितांनी सांगून यावर तोडगा काढण्याची सूचना केली. यावर कचरा समस्येतूनही शहर वासीयांची मुक्तता व्हावी यासाठी प्रशासनाने नियोजन करावे असे आमदार नाईक यांनी सांगितले.

कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांचे बिल प्रलंबित ठेवा

मालवण शहरात वायरी गर्देरोड रस्ता काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण केले नाही. अन्य काही कामेही या ठेकेदाराने पूर्ण केली नाहीत. याबाबत तपस्वी मयेकर, मंदार केणी यांनी तक्रार केली. यावर कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांची बिले पालिका प्रशासनाने प्रलंबित ठेवावीत, अशी सूचना आ. वैभव नाईक यांनी केली. यावेळी शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा झाली.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!