शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मच्छिमार संस्था पदाधिकाऱ्यांची मागणी


मालवण : आखाती भागात सुरु असलेल्या युद्धामुळे औद्योगिक डिझेलचे दर वाढले असून तेल कंपन्यांकडून मच्छिमार सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. मच्छिमारी व्यवसाय मोठ्या संकटात आला आहे, मच्छिमार संस्थांना चुकीने बल्क वर्गीकरणात समाविष्ट करण्यात आले असून मच्छिमारी संस्थांना देण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात यापूर्वी ९५ रुपयांवरून ११५ रुपये पर्यंत वाढ केल्यावर आता पुन्हा डिझेलचा दर १४४ रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याने मच्छिमार संस्थांना डिझेल खरेदी करणे व त्यावर व्यवसाय अशक्य बनले असून मच्छिमारी बंद पडण्याच्या स्थितीत असून याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी मालवण मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष विकी चोपडेकर, राजकोट मच्छिमार सोसायटीचे संचालक संतोष खांदारे यांनी केली आहे.
पेट्रोल पंपवर कमी दरात सुटे डिझेल मिळत असले तरी शासनाकडून मच्छिमार संस्थांना होणाऱ्या डिझेल पुरवठ्यामध्ये डिझेल परताव्यापोटी मिळणाऱ्या रक्कमेतून मच्छिमारांना कर्जाची परतफेड करण्यास हातभार लागतो. त्यामुळे सुटे डिझेल खरेदी करून व्यवसाय करणे देखील परवडणारे नाही, असेही श्री. चोपडेकर वं श्री. खंदारे यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे कमर्शीयल गॅस पुरवठा बंद झाल्याने हॉटेल व्यवसाय ठप्प होऊन हॉटेल व्यवसायिकांकडून मासळीची खरेदी होत नसल्याने देखील मच्छिमार दुहेरी संकटात सापडला आहे. डिझेल दरवाढीमुळे मच्छिमार संस्था वं मच्छिमारांवर उद्भवलेल्या संकटाबाबत सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री तथा मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही विकी चोपडेकर व संतोष खंदारे यांनी केली आहे.
















Subscribe to my channel




