आचरा – बोरिवली बसफेरी पुन्हा सुरू करा आगर व्यवस्थापकांना दत्ता सामंत याचे निवेदन

लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच अन्य समस्या आ. निलेश राणेच्या माध्यमातून सोडवू

मालवण प्रतिनिधी

कणकवली बस डेपोची काही वर्षांपूर्वी सुरू असलेली आचरा – बोरिवली बसफेरी बंद करण्यात आल्याने परिसरातील विविध गावांमधील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे आचरा – बोरिवली बसफेरी पुन्हा सुरू करावी अशा मागणीचे निवेदन आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांना सादर करण्यात आले.
दरम्यान मालवण आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत तसेच ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्याची सविस्तर माहिती द्यावी. त्यानंतर आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करून या समस्या सोडवण्यात येतील असे श्री. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
तालुक्यातील आचरा येथून कणकवली डेपोची आचरा – बोरिवली बसफेरी काही वर्षापूर्वी सुरू होती. ती बंद केल्याने प्रवाशांना मुंबई कडे जाताना अन्य गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्याच्या महागाईच्या काळात खासगी गाड्यांमधून प्रवास करणे सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नाही. त्यामुळे आचरा – बोरिवली बसफेरी सुरू झाल्यास आचरा, चिंदर, त्रिंबक, पळसंब या ठिकाणच्या प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे ही बसफेरी पुन्हा सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर आचरा – कोल्हापूर ही बसफेरीही सुरू करण्यात यावी अशी मागणी आगार व्यवस्थापक श्री. सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी सरपंच जेरॉन फर्नांडिस, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश कदम, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, मनोज खेडकर, जयप्रकाश परुळेकर, अजित घाडी, पंकज आचरेकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4180

Leave a Reply

error: Content is protected !!