वराड – सोनवडे पूलही आ. निलेश राणेंच्या विजयाची वाट पहात होते ; त्यांच्याच पायगुणामुळे रखडलेल्या पुलाच्या लोकार्पणाला मुहूर्त

पालकमंत्री नितेश राणेंचा टोला ; मस्ती करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा

पुलाच्या ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर आ. निलेश राणे यांची नाराजी ; सहा वर्षात वेगवेगळी कारणे दाखवून ८ कोटीची रक्कम १५ कोटी पर्यंत वाढवली

मालवण : मालवण व कुडाळ तालुका जोडणाऱ्या बहूप्रतीक्षित वराड – सोनवडे पुलाचे लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आणी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी झाले. वराड व सोनवडे गाव जोडणारा हा पूल आमदार निलेश राणे यांच्या विजयाची वाट पाहत होता, म्हणूनच याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत होत आहे. याला म्हणतात पायगुण, असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. चिपी विमानतळाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले, त्या चपट्या पायामुळे या विमानतळावर येणारी विमाने सुद्धा बंद झाली, असे सांगून जो ठेकेदार मस्ती करेल, त्याला काळ्या यादीत टाकणार. हा पैसा जनतेचा आहे. तुमच्या बापाचा नाही. वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे असे नितेश राणे म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ मालवण संपर्क प्रमुख बाळा चिंदरकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, वराड सरपंच शलाका रावले, सोनवडे सरपंच पूर्वी सावंत- धुरी, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, अशोक सावंत, काका कुडाळकर, मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, विश्वास गावकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, संतोष साटविलकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, काही गोष्टींना योग यावा लागतो आणि सर्वात महत्त्वाचा पायगुण सुद्धा आहे. गेल्या दहा वर्षात जिल्ह्याच्या विकासाला अपशकुनि पायगुणांमुळे खिळ बसली होती. पण आता झपाटाने विकास कामे होत राहतील. या मतदारसंघाचे आमदार निलेश राणे आहेत. ते या मतदार संघाचा बॅकलॉग भरून काढणार यात कुठेही शंका नाही. त्यांच्याच पायगुणामुळे या रखडलेल्या पुलाचे लोकार्पण होत आहे. नाहीतर चिपी विमानतळाचे उद्घाटन केले ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चपट्या पायामुळे विमानसेवा बंद झाली. आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना लोकहिताचा आदर करून त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या योजना महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जनतेचा पैसा जनतेसाठी वापरला गेला पाहिजे. ठेकेदारांच्या बापाचा हा पैसा नाही. हे पूल गेली सहा वर्ष रखडले यामध्ये शासनाचे मोठे नुकसान झाले. अशा ठेकेदारांना यापुढे काळ्या यादीत टाकले जाणार आणि तशा प्रकारची कार्यवाही लवकरच सुरू करू. जे कोणी कामे घेऊन आहेत. त्यांना कामे करावी लागतील. सध्या जिल्हा प्रशासनाकडून जो काही मी आढावा घेत आहेत त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. पण ते खपवून घेतले जाणार नाही. पुढील काळात जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला जाईल. तुमची साथ आम्हाला महत्त्वाची आहे आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे सांगून जिल्हा मेडिकल कॉलेजमध्ये जो काही कारभार सुरू होता तो आरोग्यमंत्र्यांच्या आमदार निलेश राणे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर येथील अधिष्ठाता यांची तात्काळ बदली करण्यात आली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले, हा लोकार्पण सोहळा होत असताना काही गोष्टी जनतेच्या निदर्शनास आणून देणे महत्त्वाचे आहेत. २०१३ मध्ये खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून हा पूल मंजूर झाला. २०१८ मध्ये सर्व तांत्रिक गोष्टी पूर्ण करून ठेकेदार नेमण्यात आला. त्यावेळी या पुलाची अंदाजपत्रकीय रक्कम आठ कोटी होती पण ती आता पंधरा कोटी पर्यंत गेली. गेल्या सहा वर्षात ठेकेदाराने वेगवेगळी कारणे सांगून अंदाजपत्रकीय रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढवून घेतली. ही गोष्ट चुकीची आहे. हा शासनाचा पैसा आहे तो ठेकेदाराचा नाही. जनतेला ठेकेदार मोठा वाटत असेल, आम्हाला नाही. त्यांनी काम वेळीच पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण ठेका देताना त्या करारात तशी तरतूद असते. या ठेकेदाराचा मुलगा आपल्या निवडणुकीमध्ये करोडो रुपये उडवतो. आणि जनतेसाठी आवश्यक असलेल्या पूलाचे काम सहा वर्षे रखडतो. हा कोणता न्याय ? हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. अशा ठेकेदारांना काळ्या यादी टाकले पाहिजे. यापुढील काळात कोणाचीही गय केली जाणार नाही असे सांगून माझ्याजवळ कोणतेही पद नसताना माजी बांधकाम मंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मला मोठे सहकार्य केले. हे पूल बनण्यासाठी त्यांचेही मोठे योगदान आहे असे सांगितले. वाळू व्यवसायिकांनी अधिकृत वाळू व्यवसाय सुरू करावा म्हणजे प्रशासनाला कारवाई करायला मिळणार नाही. तुम्ही अनधिकृत व्यवसाय करत असाल तर प्रशासन कारवाई करणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी वराड व सोनवडे गावातील जमीन दान करणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3979

Leave a Reply

error: Content is protected !!