जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवा, पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत ; नितेश राणेंची ग्वाही
वैभववाडी येथील जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता मेळाव्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
समस्या सोडविण्यासाठी दर तीन महिन्यांनी व्यापारी, प्रशासन आणि पालकमंत्री संयुक्त बैठक घेण्याची संकल्पना
वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवावे. पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात कोणतीच तडजोड होणार नाही. निधी भरपूर मिळणार, रोजगार उभा केला जाणार आहे. प्रकल्प येणार या सर्वच पार्शुभुमीवर जिल्हाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही सक्रिय झालो आहोत. व्यापारी म्हणून तुमची भूमिका आणि योगदान महत्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी, शासकीय अधिकारी आणि पालकमंत्री अशी संयुक्त बैठक दर तीन महिन्यांनी घेवून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या प्रत्येक समस्या सोडवूया आणि जिल्ह्याच्या व्यापाराला नवी ओळख निर्माण करून देवूया असे आवाहन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
Kokan Mirror
Proudly powered by WordPress
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, वैभववाडी तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, वैभववाडी व्यापारी संघटना अध्यक्ष तेजस आंबेकर, कार्यवाह नितीन वाळके, नगराध्यक्षा नेहा माईणकर, स्वागताध्यक्ष संजय सावंत, प्रसाद कुलकर्णी, श्रीकांत पाटील, अतिष कुलकर्णी, विनोद मेस्त्री, बाळासाहेब वळंजू, अरविंद नेवाळकर, सर्व तालुकाध्यक्ष, व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नितेश राणे म्हणाले, जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मला मिळालेली आहे. आपल्याला कुठल्याही समस्या निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. व्यापाऱ्यांना चांगल्या सेवा सुविधा दिल्या जातील. कोणत्याही जिल्ह्याची बाजारपेठ त्या जिल्ह्याच्या विकासासाठी,आर्थिक उन्नती होण्यासाठी महत्वाची आहे. पोलीस यंत्रणेसोबत बैठकीत मी व्यापारी, नागरिक यांना त्रास देवू नये. सुरक्षित व्यापार करता यावा यासाठी सूचना दिल्या आहेत. यापूर्वी पासून मी आमदार असल्यापासून व्यापारी आणि नागरिकाच्या काय अडचणी आहेत हे माहित आहेत. सरकारच्या संपूर्ण यंत्रणा आपल्यासाठी आहेत. जिल्ह्याचे व्यापार धोरण ठरविण्याची गरज आहे. अधिकृत दुकाने राहिली पाहिजेत. ती वाढली पाहिजेत. अनधिकृत व्यापाराला अंकुश येण्यासाठी आपण जागृत असेल पाहिजे. सर्वजण एकत्र मिळून काम केले पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीने तडजोड होता नये. असे सांगताना कणकवलीत १६ लोक थेट युपी मधून येवून व्यापार करतात. नोयेडा मधील माणूस आपल्या बाजारात बॅग विकत होता. संविधानाने प्रत्येकाला व्यापार व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र आपल्याला जागृत राहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व गोष्टींचा विचार व्यापारी संघानेही केला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.
या मेळाव्यात जिल्ह्यातील व्यापारी वर्गाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा देखील सत्कार नितेश राणे यांनी स्वीकारला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. पुरस्कार प्राप्त व्यापारी टी एस घोणे, नयन मोरे, श्रीमती सरोजिनी भोवड, श्रीराम शिरसाट, भैय्या सामंत यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. माई हुंदाई च्या वतीने नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खातू मसाले चे प्रतिनिधी यांनी देखील नितेश राणे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सावंत यांनी केले. मनोगत नितीन वाळके, नेहा माईणकर, तेजस आंबेकर यांनी केले. संपूर्ण मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र पाताडे यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या संख्येने व्यापारी बांधव या मेळाव्याला उपस्थित होते. व्यापारी मेळाव्याचे नियोजन चांगले केल्याबद्दल वैभववाडी व्यापारी संघटनेचे सर्व व्यापारी बांधवांनी आभार मानले.