सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ले पर्यटकांना खुले !

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील होडी वाहतूकीस आजपासून सुरुवात

होडी वाहतूक संघटनेने मानले आ. वैभव नाईकांचे विशेष आभार

मालवण : राज्य शासनाने राज्यातील विविध स्मारके, ऐतिहासिक वास्तू सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या अनुषंगाने किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी बोट वाहतुकीसह व विजयदुर्ग किल्ला नागरिक, पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटक, नागरिक, प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिकांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असून याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संबंधित विभागास दिला आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून ही सेवा सुरू झाली आहे. याबाबत सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी व्यावसायिकांनी आमदार नाईक यांचे विशेष आभार मानले आहेत.

जिल्हाधिकार्‍यांनी कोविडच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीसह तसेच विजयदुर्ग किल्ला नागरिक व पर्यटकांसाठी अटी, शर्थीसह सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यात ज्या पर्यटकांनी कोविड लसीचे दोन डोस घेतले आहे, त्यांचे प्रमाणपत्र पाहून त्यांना प्रवासी होडीत प्रवेश दिला जाणार आहे. अन्य नागरिक, पर्यटकांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगावा लागणार आहे. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बोट चालक, विजयदुर्ग किल्ल्यावर मार्गदर्शन करणार्‍या मार्गदर्शकांनी कोविडच्या दोन्ही लस घेणे बंधनकारक आहे. ज्यांचे दोन डोस पूर्ण नाहीत त्यांनी आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्हचा अहवाल सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे. सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यावर गर्दी होणार नाही अशा पद्धतीने नौकांच्या फेर्‍यांचे व पर्यटकांचे नियोजन करण्यात यावे. प्रवासी वाहतूक करताना व्यवस्थापनाने व पर्यटकांनी सामाजिक अंतर पाळावे, बोटी सॅनिटाईझ करणे, पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचना देणे, मास्क व सॅनिटाझर वापर याचे नियोजन करण्याची जबाबदारी संस्थेची राहणार आहे. बुकींग ऑफीसच्या ठिकाणी सामाजीक अंतर पाळणे आवश्यक आहे. येणार्‍या प्रवाशांचे नाव, पत्ता, वय व मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून, तापमान, ऑक्सीजन पातळी तपासण्यात यावी. ज्या पर्यटकांना कोविड 19 सदृश लक्षणे उदा. सर्दी, खोकला, ताप असल्यास अशा प्रवाशांना प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. तिकीट मिळाल्यानंतर जेटीच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळून बोट प्रवाशांना प्रवेश देण्यात यावा, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येक फेरीच्या वेळी बोट निर्जंतुक करणे बंधनकारक असणार आहे. वेळोवेळी शासनामार्फत दिल्या जाणार्‍या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल. प्रवासी बोट वाहतूकीसाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व प्राधिकरणांच्या सर्व परवानग्या घेणे बंधनकारक असेल अशा अटी घालण्यात आल्या आहेत. याचा भंग केल्यास तसेच विषाणू संसर्ग होईल असे कोणतेही कृत्य केल्यास परवानगी रद्द केली जाईल. संबंधितद व्यक्ती, संस्था, समूहाविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 मधील तरतुदींप्रमाणे कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!