गावागावात देशभक्त निर्माण करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे!

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र; मोदी-फडणवीस सरकारच्या योजनांचा तळागाळात प्रचार करण्याचे आवाहन

आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने कोकणातील तरुणांना रोजगारासाठी विशेष प्रयत्नांचा ठराव

रत्नागिरी : गावागावात देशभक्त निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे. संघटना मजबूत करण्यासाठी तन, मन आणि धन अर्पण करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध विकासकामांची तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.

रत्नागिरीतील माळनाका येथे भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची सभा व आढावा बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार असून, विविध नगर परिषदांमध्ये भाजपचे नगरसेवक, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता आगामी काळात पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करावे, असे चव्हाण यांनी सांगितले.

SIR प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी SIR प्रक्रियेबाबत माहिती दिली. मतदार यादीत अद्याप नावे समाविष्ट नसलेल्या नागरिकांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपली नावे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत. या प्रक्रियेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सक्रियपणे लक्ष घालून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

भाजप शत प्रतिशत’साठी संघटनात्मक ताकद वाढवणार

भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजप प्रशिक्षण वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रशिक्षण घेतले असून, आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची संघटना अधिक मजबूत करून ‘भाजप शत प्रतिशत’ करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या आढावा बैठकीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस योगेश सागर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद आधटराव, माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर, रत्नागिरी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, देवरूख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्यासह बिजली खान, लियाकत शहा, राजापूर भाजपा तालुकाध्यक्ष मोहन घुमे, रत्नागिरी भाजपा तालुकाध्यक्ष दादा दळी, पंचायत समिती उपसभापती अभिजित गुरव, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, सुप्रिया ऊतेकर, जिल्हा नियोजन सदस्य अमित केतकर, सचिन वहाळकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव ऐश्वर्या जठार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, चिपळूण उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर, भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे तसेच जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!