आ. नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा !

अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी दुपारी सुनावणी

शुक्रवार पर्यंत अटक करणार नाही : पोलिसांची हायकोर्टात ग्वाही

कुणाल मांजरेकर

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी सरकारी पक्षाच्या वतीने आ. राणे यांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध केल्यानंतर याबाबतचे सविस्तर प्रतिज्ञापत्र शुक्रवार पर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी दुपारी २.३० वाजता मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. तोपर्यंत आमदार नितेश राणे यांना अटक करणार नाही, अशी ग्वाही पोलिसांनी न्यायालयासमोर दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना नेते सतीश सावंत यांचे कार्यकर्ते असलेल्या संतोष परब यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. या प्रकरणात ६ जणांना अटक करण्यात आली आहे. तर आमदार नितेश राणे यांच्यावरही हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तब्बल दोन दिवस सुनावणी होऊन जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. यामुळे आमदार नितेश राणे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी सकाळी घेण्यात आली. आमदार नितेश राणे यांच्या वतीने ऍड. नितीन प्रधान यांनी युक्तिवाद केला. यावेळेस सरकारी पक्षाने संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी केली. त्यावर सरकारी पक्षाला त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे दोन दिवसात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी दुपारी २.३० वाजता होणार आहे. तोपर्यंत आमदार नितेश राणे यांना अटक करणार नाही, अशी ग्वाही पोलिसांनी न्यायालयात दिल्याने नितेश राणे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!