कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी समाजाचं काहीतरी देणं लागतो हे कायम लक्षात ठेवा…

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांचे कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन

मालवण : शिक्षण ही सध्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात उच्चशिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणातूनच भविष्यातील समाज घडणार आहे. शिक्षणातून तुमची प्रगती नक्कीच होईल तुम्ही यशाच्या शिखरावर पोचणार पण हे सर्व मिळविताना आपल्या समाजाचा विसर पडू देऊ नका, आपण कितीही मोठ्या पदावर पोचलो तरी समाजाचं काहीतरी देणं लागतो हे कायम लक्षात ठेवा. तुमच्यामधूनच एखादा विद्यार्थी उच्चशिक्षण घेऊन जिल्ह्यातील मोठ्या पदावर कार्यरत व्हावा आणि आम्हाला त्याचा सन्मान करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत समाजसेवेचे व्रत शेवट पर्यंत जोपासा असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी कट्टा येथे आयोजित भंडारी समाज संघ कट्टाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना केले.

कट्टा पंचक्रोशी भंडारी समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवन करून करण्यात आली. यावेळी भंडारी संघाचे जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप आवळेगावकर, माजी जिल्हाध्यक्ष मामा माडये, रमण वायंगणकर, मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर, युवा जिल्हाध्यक्ष समील जळवी, कार्याध्यक्ष राजू गवंडे, माजी जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, सचिव भरत आवळे, श्रीकांत वेंगुर्लेकर, रमेश हरमलकर, श्री.पेडणेकर, बाबुराव मसुरकर, मामा बांदिवडेकर, सरपंच सौ.लता खोत, अँड. प्रदीप मिठबावकर, मंगेश माडये, आनंद टेमकर, निलेश हडकर, सुरेश कांबळी, गणेश वाईरकर, प्रवीण मिठबावकर, सुनील पोखरणकर, सुनील शिरोडकर, संदेश नाईक, विद्याधर चिंदरकर, संतोष हिंदळेकर, अजय मयेकर, प्रकाश सरमळकर, योगेश पाटकर, किशोर वाक्कर, बाळा कांबळी, सुरेंद्र जबडे व अन्य समाज बांधव, समाज भगिनी, व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना मालवणच्या नगराध्यक्ष ममता वराडकर म्हणाल्या, कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाने सातत्याने जोपासलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. कारण आपण आपल्या मुलाच्या पाठीवर कौतुकाची हाक देणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यात ज्ञान हीच गोष्ट अखेर पर्यंत यशस्वी होण्यासाठी साथ देणार आहे. उच्च शिक्षण असल्यास तुम्हाला स्वतः सोबत समाजाचे नाव उज्वल करण्यासाठी निश्चितच मदत होईल. कितीही मोठे झालात तरी समाजाचे ऋण विसरू नका. कारण भविष्यातील समाजाची धूरा ही तुम्हा विद्यार्थी व युवा पिढीच्या हातात असणारा आहे. स्वतःसोबत समाजाचे नाव उज्वल करा.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप आवळेगावकर म्हणाले, सर्व समाज बांधवांच्या एकोप्यातून आजचा कार्यक्रम यशस्वी होत आहे. यापुढे देखील शेतीविषयक मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, नोकरी मार्गदर्शन व उच्च शिक्षणाच्या मार्गदर्शनासाठी कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे सांगितले. यावेळी रमण वायंगणकर, राजू गवंडे, ॲड. प्रदीप मिठबावकर, यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान दहावी, बारावी नंतर काय ह्या विषयावर MITM अभियांत्रिकी महाविद्यालय सुकळवाड सिंधुदुर्ग यांच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गौरव नाईक, प्रास्ताविक प्रदीप मिठबावकर व आभार त्रिशा हडकर यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!