भुईबावडा घाटातून अवैधपणे होतेय अवजड वाहतूक ; घाटरस्ता पुन्हा बंद होणार ?

वैभववाडी (प्रतिनिधी)
जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे नादुरुस्त बनलेल्या भुईबावडा घाटातून केवळ हलक्या वाहनांना वाहतूकीस परवानगी दिलेली आहे. मात्र तरीही येथून बेकायदेशीरपणे अवजड वाहतूक सुरू असून यांमुळे घाट रस्ता खचून घाटातील वाहतूक पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भुईबावडा घाटात रस्त्याला भेगा जाऊन रस्ता खचला आहे. याठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने २२ जुलैपासून घाटमार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा घाटमार्ग बंद असल्यामुळे भुईबावडा, उंबर्डे, खारेपाटण, राजापूर तालुक्यातील काही गावांना मोठा वळसा घालून करुळ घाटमार्गातून ये जा करावी लागत होती. त्यामुळे नागरीकांचा वेळ व पैशाचा अपव्यय होत होता. घाटमार्गातून वाहातूक सुरु करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याठिकाणी साईडपट्टीकडच्या बाजूला रुंदीकरण करुन वाहातूक सुरु करण्याची सूचना केली होती. त्यानुसार त्याठिकाणी रुंदीकरण करुन छोट्या वाहनांना ये जा करण्यासाठी गुरुवारपासून प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र याचा फायदा घेत घाटातून अवजड वाहनांना बंदी असतांनाही राजरोसपणे अवजड वाहतूक केली जात आहे. या अवजड वाहतूकीमुळे याठिकाणी रस्ता खचून संपूर्ण वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. सध्या किमान अत्यावश्यक प्रवाशी वाहतूक तरी केली जात आहे. अवजड वाहतूकीने रस्ता खचल्यास सर्वच वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. त्यासाठी घाटातून अवजड वाहतूक बंद करावी. बंदी असूनही वाहतूक करणाऱ्या वाहानांवर कारवाई करावी.अशी मागणी भुईबावडा दशक्रोशीतील नागरीकांकडून केली जात आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!