राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग आणि किनारपट्टीवर दोन दिवशीय स्वच्छता मोहीम



मालवण | कुणाल मांजरेकर
सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कॉलेज (MITM) च्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागामार्फत १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मालवणचा समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक जबाबदारीचा आदर्श जपला.

शिबिराच्या पहिल्या दिवशी मालवणमधील प्रसिद्ध चिवला बीच येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे किनाऱ्यावर जमा झालेला प्लास्टिक कचरा, काचेच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तू स्वयंसेवकांनी एकत्रित केल्या. या मोहिमेतून केवळ परिसर स्वच्छ झाला नाही तर उपस्थित पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनाही पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.दुसऱ्या दिवशी शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक ‘किल्ले सिंधुदुर्ग’ येथे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. गडाच्या तटबंदीचा परिसर आणि पर्यटन मार्गावरील कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला. आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले.या यशस्वी उपक्रमासाठी संस्थेचे स्टाफ इन्चार्ज सिद्धेश शिंदे, साई पवार, दीपिका फर्नांडिस, सुदेश जामसंडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच वरिष्ठ विद्यार्थी साहिल शिंदे यांनी शिबिरासाठी आवश्यक साहित्याची जबाबदारी सांभाळली तर माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत यांनी संपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहकार्य केले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाप्रती जागरूकतेची भावना निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.


Subscribe to my channel




