भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचे मतदारांना आवाहन : सिंधुदुर्गात सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास


मालवण : केंद्र, राज्य आणि जिल्ह्यात महायुती सक्षमपणे काम करीत असल्याने सिंधुदुर्गात सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत यांनी व्यक्त केला आहे
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक सावंत यांनी पत्रकारांची संवाद साधला. ते म्हणाले, 1990 पासून आपण माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. 1990 पूर्वी म्हणजेच भाजप नेते नारायण राणे हे सिंधुदुर्गात येण्यापूर्वी या भागात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, साकव यांचे प्रश्न बिकट होते. या भागात पायाभूत सुविधा नव्हत्या. अशावेळी 1990 मध्ये या भागाचे आमदार म्हणून नेतृत्व करणाऱ्या नारायण राणे यांनी या भागात पायाभूत सुविधा व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले आणि हे प्रयत्न सफल करून दाखवले.
या भागाचा विकास होण्यासाठी प्रथम प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे हा विचार घेऊन खासदार नारायण राणे यांनी काम केले. आजही हाच विचार घेऊन ते काम करीत असल्याने या भागाचा विकास होत असे, हे विरोधकही मान्य करीत आहेत, असे सांगून ते म्हणाले, खासदार नारायण राणे यांच्या आशीर्वादामुळे मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करू शकलो. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करताना मी फक्त घोषणा नाही, तर रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य केंद्रे आणि विकासाचे ठोस काम करून दाखवले आहे. महायुती म्हणजे फक्त पक्षांची बेरीज नाही, महायुती म्हणजे हिंदुत्व, विकास आणि स्थैर्याचा मजबूत गठ्ठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गावागावात योजना पोहोचल्या. घरकुल, जलजीवन मिशन, रस्ते, वीज, महिला सक्षमीकरण करण्यात आले आहे, असेही श्री. सावंत म्हणाले.

आज विरोधक काय करतात ? काम नाही, पण आरोप आहेत. योजना नाहीत, पण अफवा आहेत. जनतेशी नाळ नाही, त्यांना फक्त सत्तेची हाव आहे! अशा लोकांना या निवडणुकीत ‘क्लीन बोल्ड’ करायची वेळ आली आहे. महायुतीने महिलांना केवळ मतदार मानले नाही, तर सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन दिले. बचत गट, लाडकी बहीण, आरोग्य सुविधा, रस्ते, बाजारपेठ, पाणी, वीज, अनुदान महायुतीने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम केले. फक्त भाषणं नाही, धरणं, बंधारे, सिंचन दिलं आहे, असेही श्री. सावंत म्हणाले. ही निवडणूक म्हणजे बटण दाबण्याची नाही, ही निवडणूक म्हणजे भविष्य घडविण्याची संधी आहे. या संधीचा उपयोग महायुतीच्या उमेदवाराला विजयी करूया असेही श्री सावंत म्हणाले.

Subscribe to my channel




