संग्राम कासले यांच्या चला बोलूया – वक्तृत्व स्पर्धा गाजवूया या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

मालवण, ता. ७ : वक्तृत्व कसे करावे तसेच लोकांशी संवाद कसा साधावा, काय बोलावे आणि कसे बोलावे याचे सुंदर विवेचन व मार्गदर्शन संग्राम कासले यांनी आपल्या ‘चला बोलूया- वक्तृत्व स्पर्धा गाजवूया’ या पुस्तकातून केले आहे. आज वाचन आणि वक्तृत्व या गोष्टींपासून दूर जात असलेल्या मुलांसाठी हे पुस्तक महत्वपूर्ण असून प्रत्येक विद्यार्थी, पालक व शाळेपर्यंत हे पुस्तक पोहचले पाहिजे, संग्राम कासले यांचे पुस्तक मुलांना बोलण्यास प्रवृत्त करेल, असे कौतुकोद्गार मान्यवरांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात काढले.
येथील पत्रकार संग्राम कासले यांनी लिहिलेल्या चला बोलूया वक्तृत्व स्पर्धा गाजवूया या पुस्तकाचे प्रकाशन मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण मध्ये सेवांगण व आस्था ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष पद्मनाभ शिरोडकर, प्रमुख पाहुण्या सेवानिवृत्त शिक्षिका व लेखिका मेघना जोशी, आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, सेवांगणचे विश्वस्त दिपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, संग्राम कासले आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे प्रफुल्ल देसाई यांनी विचार मांडत कासले यांनी लिहिलेले पुस्तक छोटेखानी असले तरी वक्तृत्व कलेविषयी सखोल मार्गदर्शन करणारे आहे. हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर संवाद कौशल्य विकसित करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले. मेघना जोशी म्हणाल्या, स्वतः वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन यश मिळविणाऱ्या संग्राम कासले यांनी वक्तृत्व स्पर्धेत कसे बोलले पाहिजे, समाजामध्ये वावरताना कशाप्रकारे संवाद साधला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामधून यांनी केला आहे, पालकांनी आपल्या मुलांसाठी आवर्जून घ्यावे, असे हे पुस्तक आहे. दीपक भोगटे यांनी आजच्या काळात वक्तृत्व विकसित करणे आवश्यक आहे, यासाठी हे पुस्तक प्रत्येक शाळा व मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी सेवांगण मार्फत प्रयत्न करू असे सांगितले. तर पद्मनाभ शिरोडकर यांनी ज्या संसदपटूनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने भाषणे गाजवली अशा बॅ. नाथ पै यांच्या नावे असलेल्या वास्तूत या पुस्तकाचे प्रकाशन होतेय ही आनंदाची गोष्ट असल्याचे सांगितले. यावेळी संग्राम कासले यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्यांना वक्तृत्व कलेची आवड आहे, अशा प्रत्येकासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे, असे सांगितले.
यावेळी पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे प्रफुल्ल देसाई व पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करणारे श्रीराज बादेकर यांचा संग्राम कासले यांनी भारतीय संविधान उद्देशिका प्रतिमा देऊन सत्कार केला. तसेच दिपक भोगटे यांनी संग्राम कासले यांची रेखाटलेली प्रतिमा संग्राम कासले यांना प्रदान केली. सूत्रसंचालन सुविधा कासले- जाधव यांनी केले तर आभार ऋतुजा केळकर यांनी मानले.
यावेळी सेवांगणचे कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, ज्योती तोरसकर, सेवांगणचे व्यवस्थापक संजय आचरेकर, भाऊ सामंत, सतीश कासले, सुप्रिया कासले, पौर्णिमा कासले, विकी जाधव, हेमतं परब, सुनिल खरात, हर्षद बेनाडे, सचिन आचरेकर व इतर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4227

Leave a Reply

error: Content is protected !!