आयुष्यात चांगले प्रयत्न करा, निश्चितच यश तुमच्या पदरात पडेल !


पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे प्रतिपादन ; एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
मालवण | कुणाल मांजरेकर

जीवनात रियल चॅलेंज महत्त्वाचे आहे. कॉलेज जीवन संपल्यावर प्रत्येकाला रियल लाईफला सामोरे जावे लागणार आहे. जीवनातील हे चॅलेंज स्वीकारून आपण कशा प्रकारे पुढे जाणार हे महत्त्वाचे आहे. यावरच आपले भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात चांगले प्रयत्न करा, निश्चितच यश तुमच्या पदरात पडेल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले. ओरोस (सुकळवाड) येथील एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी एमआयटीएम कॉलेजच्या शैक्षणिक वाटचालीचे त्यांनी कौतुक करीत कॉलेजला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जयवंती बापू फाउंडेशन संचलित एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे जल्लोषात उदघाट्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल उपस्थित होते. त्यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सौरभकुमार अग्रवाल यांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणीना उजाळा मिळाल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यालयांना प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या काही मुख्याध्यापकांचे सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलताना शिवाजी विद्यालय हिर्लोकचे मुख्याध्यापक सत्कारमूर्ती दिनेश महाडगुत म्हणाले, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारे कॉलेज म्हणजे एमआयटीएम आहे. या कॉलेजचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी नक्कीच फायदा होईल आणि आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी इंजीनियरिंग मार्फत उच्च पदावर विराजमान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी कसाल न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सत्कारमूर्ती उत्तम मळगावकर देखील उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे करिअर घडवून देण्याचे काम उत्तमरीत्या एमआयटीएम कॉलेज करत आहे. फक्त विद्यार्थ्यानी आपला उद्देश व ध्येय साध्य करणे आवश्यक आहे, असे सांगितले. तर पाट हायस्कूल आणि जुनियर कॉलेजचे मुख्याध्यापक सत्कारमूर्ती राजन इंजनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मी एक क्रीडा शिक्षक म्हणून फिजिकल टीचर्स असल्याने जबाबदारी स्वीकारणे हे जसे शिक्षकाचे काम आहे, त्याचप्रमाणे तुम्ही देखील आपल्या आयुष्यातील जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडावी असे सांगितले.

यावेळी संस्थेचे विश्वस्त विनोद कदम यांनी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. एमआयटीएम हे दुर्गम भागातील अभियांत्रिकी कॉलेज असून गेल्या १४ वर्षात या कॉलेजने शैक्षणिक क्षेत्रात आपला नावलौकिक केल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्या व्यतिरिक्त अन्य राज्यातील विद्यार्थी आज आपल्याकडे शिकत आहेत आणि शिकून उच्च पदावर गेली आहेत. तुम्ही उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करत रहा. आम्ही तुमच्यासाठी पुढील भविष्यात निर्माण होणाऱ्या स्पर्धा परीक्षांकरिता प्रयत्न करू आणि आपल्या विद्यार्थ्यांना यशस्वी मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. भविष्यातील होणाऱ्या सुवर्णसंधीचा तुम्ही फायदा करून घ्यावा, असे सांगून त्यांनी श्री सद्गुरु वामनराव पै यांच्या विचारांचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. यावेळी संस्थेच्या खजिनदार सौ. वृषाली कदम, डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ एस. व्हि. ढणाल, डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे, उपप्राचार्य सौ. पूनम कदम उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, सेक्रेटरी सौ. नेहा पाल तसेच विश्वस्त श्री. केतन कदम यांनी शुभेच्छा दिल्या.

