पर्यटन विकासासाठी आचरा समुद्र किनारी भव्य गार्डन उभारा

समीर हडकर यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण शहरातील रॉक गार्डनच्या धर्तीवर आचरा समुद्रकिनारी भव्य गार्डन उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आचरा येथील शिवसेना पदाधिकारी समीर हडकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी प्रकाश वराडकर, जयंत पांगे, गजू गावकर, राजन पांगे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील निसर्गसंपन्नतेने नटलेले आचरा गाव हे येथील स्वयंभु व अतिप्राचीन असलेल्या सुप्रसिध्द इनामदार श्री देव रामेश्वराच्या जागृत देवस्थानामुळे कोकण भुमीसह सातासमुद्रापार ओळखले जाते. या आचरा गावास समुद्राची विस्तिर्ण किनारपटटी लाभलेली आहे. त्यामुळेच तेथे बारमाही पर्यटकांची वर्दळ असते. निसर्गरम्य व शांत असलेला समुद्र किनारा, नैसर्गिक वैविधपुर्ण हरितसमृध्दी, जामडूल बेट त्याचबरोबर भौगोलिक दृष्टया दळण वळणाच्या दृष्टीने केंद्रस्थानी असलेले गाव यामुळेच अनेक पर्यटक, इतिहास संशोधक, इ. लोकांची पाउले गेल्या अनेक दशकापासून येथे वळत आहेत. जवळ तोंडवळी गावात प्रस्तावित असलेले सी-वर्ल्ड पासून हे गाव लगतच आहे.
मालवण शहरातील प्रशस्त रॉकगार्डनच्या धर्तीवर आचरे समुद्रकिनारी असे एखादे भव्य गार्डन, तसेच प्रत्येक दिवशी समुद्र किनारी फिरावयास येणारे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नाना नानी उद्यानाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व आपल्या प्रयत्नाने झाल्यास जनसामान्यासहीत बाहेरील पर्यटकांसाठी आकर्षणाचा मानबिंदु ठरेल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!