२०२९ च्या शतप्रतिशत विजयासाठी आतापासूनच जनतेच्या प्रश्नांवर काम करा…

आमदार प्रमोद जठार यांचे मालवणात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन ; सी-वर्ल्ड प्रकल्प, कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन कल्पना घेऊन पुढे येण्याचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ती एक विचारधारा आहे. या प्रवाहामध्ये सामील होणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो काल आलेला असो वा जुना, तो आपोआप निष्ठावानच होतो. त्यामुळे मनातले हेवेदावे काढून टाका आणि प्रत्येकाचे स्वागत करा. २०२९ मध्ये ‘शत-प्रतिशत’ यश मिळवायचे असेल, तर आतापासूनच जनतेच्या प्रश्नांवर काम करा,” असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी गुरुवारी मालवण येथे केले.

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आमदार जठार यांचा मालवण तालुका भाजपच्यावतीने येथील पक्ष कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, विलास हडकर, महेश मांजरेकर, मंदार केणी, पंकज सादये, शिल्पा खोत, अन्वेषा आचरेकर, अमिता निवेकर, दीक्षा गावकर, रविकिरण तोरसकर, सौ. रश्मी लुडबे, राजू परुळेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. जठार म्हणाले की, “मला आमदार केले ते केवळ कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे आणि वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासामुळे. पक्षासाठी जे जे उत्तम करता येईल, ते आपण करूया. या पक्षात कोणाचीही मक्तेदारी नाही. आपण साडेतीन हजार वर्षांची महान परंपरा सांगणाऱ्या संस्कृतीचे पाईक आहोत. त्यामुळे दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानाने सामावून घ्या. ते पुन्हा नाराज होऊन दुसऱ्या पक्षात जातील अशी कृती आपल्याकडून होता कामा नये. सत्ता आणि संपत्ती आली की अनेकदा माणसाला गर्व होतो, पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पक्ष हे केवळ एक साधन आहे. साध्य तर शेवटच्या गरीब माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हे आहे. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून योजना तळागाळापर्यंत पोहोचवा. बेरोजगार, पाणी प्रश्न आणि मूलभूत सुविधांसाठी कार्यकर्त्यांनी ‘मंत्री’ म्हणून जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले “मालवण आज जगाच्या नकाशावर एक ‘वर्ल्ड डेस्टिनेशन’ म्हणून ओळखले जात आहे. येथील सी-वर्ल्ड प्रकल्प, कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन कल्पना घेऊन पुढे या. मालवणच्या विकासाचा एक ठोस ‘रोडमॅप’ तयार करा. पालकमंत्री आणि शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. विकासाचा जो बॅकलॉग आहे, तो आपल्याला भरून काढायचा आहे.”

निवडणुका युतीमध्ये लढल्या जातात, पण पक्ष कार्यकर्त्यांच्या समन्वयावर चालतो. पालघरपासून कोकणापर्यंत समन्वयाचे काम माझ्याकडे आहे आणि तंटामुक्तीच्या भूमिकेतून आपण सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी प्रभाकर सावंत, धोंडी चिंदरकर, मंदार केणी, विलास हडकर यांनी आपले विचार मांडले.

error: Content is protected !!