हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह ५० % क्षमतेने ; मग पर्यटन स्थळे १०० % बंद का ?

सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतुकीला ५० % क्षमतेने परवानगी देण्याची मागणी

होडी व्यवसायावर अवलंबून राहिलेल्या २०० कुटूंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण

कुणाल मांजरेकर

मालवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार राज्यातील पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पर्यटन व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह ५० % क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात येते. मग पर्यटन स्थळे १०० % बंद का ? असा सवाल सिंधुदुर्ग किल्ला होडी व्यावसायिकांनी केला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर होडी सेवा देणाऱ्या ७१ होड्या असून त्यावर २०० कुटुंब अवलंबून आहेत. त्यामुळे होडी वाहतूक बंद झाल्यास या २०० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अटी शर्ती घालून सिंधुदुर्ग किल्ला होडी प्रवासी वाहतूकीला परवानगी द्यावी, अशी मागणी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे मालवणातील पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अद्याप जिल्हा प्रशासनाने नवीन नियमावली बाबत भूमिका स्पष्ट केली नसून उद्या (सोमवारी) जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नियमावली जारी करण्याची क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिक संघटनेने पर्यटन व्यवसायासाठी हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी करत कोरोना विषयक नियमांना अधीन राहून ५० टक्के पर्यटक प्रवाशांच्या उपस्थितीत किल्ला होडी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी केली आहे

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे कोरोनाची तिसरी लाट निर्माण झाल्याने राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहे. या निर्बंधांमुळे मालवण मधील पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पूर्वीच्या कोरोनाच्या दोन्ही लाटेत लॉकडाऊन व निर्बंधांमुळे पर्यटन व्यासायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. आता पुन्हा लागू झालेल्या निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसाय पुन्हा अडचणीत येणार असल्याने पर्यटन व्यवसायाला या निर्बंधांमधून शिथिलता मिळावी, अशी मागणी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी केली आहे. पर्यटन व्यवसायावर निर्बंध लादण्यात येऊ नयेत. हा व्यवसाय आता पर्यटन हंगामातील उरलेले पाच महिने चालणार असून पुढे पावसाळ्यात चार महिने हा व्यवसाय बंद राहणार आहे. तसेच अवकाळी पाऊस, वादळे यामुळेही अनेकदा पर्यटन व्यवसाय बंद राहत असल्याने नुकसान सहन करावे लागते. आता नव्या निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसाय ठप्प होण्याची भीती आहे. पर्यटन व्यवसायासाठी नियम शिथिल केले नाही तर पर्यटन व्यावसायिकांवर, प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे नियमात शिथिलता दिल्यास नियमांना अधीन राहून सोशल डिस्टन्स पाळून होडी मध्ये ५० टक्के प्रवाशांच्या उपस्थितीने किल्ला होडी वाहतूक व्यवसाय आम्ही सुरू ठेवू, गेले दोन दिवस आम्ही ५० टक्के क्षमतेने वाहतूक सुरू केली आहे, असे मंगेश सावंत यांनी म्हटले आहे. या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पालकमंत्री उदय सामंत, खासदर विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधणार आहोत असेही श्री. सावंत यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!